श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि त्यांची वाचन कौशल्ये विकसित करणे हा आहे. पंधरवड्यामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी, इन्स्टिटयूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे आणि प्रा. अशोक कोळेकर यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आली. वाचनातून घडणाऱ्या सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिकत्वावर भाष्य केले. यावेळी वाचन कौशल्य कार्यशाळा घेण्यात आली, ज्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक प्रा. अशोक कोळेकर यांनी विद्यार्थांना वाचनाचे महत्त्व, योग्य वाचन तंत्र, आणि वाचनातून होणारे शैक्षणिक व वैयक्तिक फायदे यावर विस्तृत मार्गदर्शन केले. त्यांनी वाचन कौशल्य वाढविण्यासाठी प्रात्यक्षिकेही सादर केली. ज्यामुळे विद्यार्थ्यांना वाचन कौशल्यांचा सराव करण्यास प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सामूहिक वाचन सत्र आयोजित करण्यात आले. पदवी आणि पदविका अभियांत्रिकीच्या अनेक विद्यार्थ्यांनी या सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रा. तन्मय कुलकर्णी, प्रा. सुदर्शन महाडिक यांनी आयोजन केले. या उपक्रमासाठी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्रा. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रंथपाल महेश देसाई यांनी आभार मानले.
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम
